Powered By Blogger

Tuesday, 15 June 2021

कृतिशील प्रखरबुद्धीप्रामाण्यवादी : नानासाहेब

ना. ग. ऊर्फ नानासाहेब गोरे. हे नाव मला माहीत पडले ते, डॉ. अनिल अवचट यांचे 'माणसं' आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे 'भ्रम आणि निरास' ही नव्वदीच्या दशकात प्रकाशित झालेली पहिलीवहिली पुस्तके वाचल्याने. या दोन्ही पुस्तकांना नानासाहेबांच्या प्रस्तावना आहेत. त्यानंतर वाचनात आला तो नानासाहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 1987 साली प्रकाशित झालेला 'गोरे गौरव ग्रंथ'. या ग्रंथांत अनेक मान्यवरांचे नानासाहेबांबद्दल लेख आहेत. पण त्यात शेवटी स्वतः नानासाहेबांनी लिहिलेला 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख आहे. आयुष्याचा फार मोठा काळ ओलांडून नानासाहेब अनुभव आणि विचारांची शिदोरी घेऊन एका टप्प्यावर उभे असताना हा लेख लिहिलेला आहे. त्यामुळे लेखातील ते शब्द अत्यंत तर्कशुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. ते वाचून सळकन वीज चमकावी तसे डोक्यात चमकले होते आणि त्या विजेचा लख्ख प्रकाश आजही डोक्यात आहे. 

नानासाहेबांची जडणघडण, व्यक्तिमत्व, कृती आणि विचार हे दीपस्तंभ आहे. नानासाहेब म्हणजे भारतातील समाजवादी आणि राजकीय चळवळीतील अग्रगण्य नाव आहे, हे विधान अजिबात धाडसाचे नाही. मात्र नानासाहेबांचे धडाडीचे व्यक्तिमत्व आणि धगधगते विचार पेलविणे मात्र धाडसाचे ठरेल. १९०७ ते १९९३ अशी ८५ वर्षे नानासाहेब जगले. १९३० साली वयाच्या 23 व्या वर्षी मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याने नानासाहेबांना तुरुंगवास झाला. हा सुरू झालेला प्रवास पुढे असाच चालू राहिला. अनेकदा तुरुंगवास, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना, चले जाव आंदोलन, समाजवादी पक्षाची स्थापना, लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा पराभूत, तर एकदा काकासाहेब गाडगीळांचा पराभव करून विजयी. समाजवादी पक्षात फूट, प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना, पुन्हा समाजवादी पक्षाचे एकीकरण, राज्यसभेवर खासदार , जनता पक्षाच्या काळात ब्रिटनमध्ये उच्चायुक्त, साधना साप्ताहिकाचे संपादक असा हा नानासाहेबांचा प्रवास झालेला आहे. रोजनिशी, ललित लेख, पत्रे, लेखसंग्रह, भाषण संग्रह, प्रस्तावना, पुस्तक परीक्षणे, तत्वचिंतन,  बालसाहित्य, भारताची पूर्व सरहद्द, अमेरिकेच्या संघराज्याचा इतिहास, आपली संसद अशी 24 पुस्तक नानासाहेबांनी लिहिली. नेहरू, जयप्रकाश नारायण, सर्वपल्ली राधाकृष्णन, कालिदास, मिनू मसानी, राजेंद्र प्रसाद यांच्या 6 पुस्तकांचे अनुवाद नानासाहेबांनी केले आहेत. या सर्व पुस्तकातील निवडक लेख 'नारायणीय' या पुस्तकात आहेत. तसेच न्या. नरेंद्र चपळगावकर, वसंत बापट, ग. प्र. प्रधान यांचेही विशेष लेख या पुस्तकात आहेत. नानासाहेबांचा 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख देखील या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा.

 'नारायणीय' या पुस्तकाची पहिली आवृत्ती ही नानासाहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झाली होती. लेखांची निवड आणि पुस्तकाचे संपादन ग. प्र. प्रधान आणि वसंत बापट यांनी केले आहे. 2001 साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख त्यात समाविष्ट केला आहे. कालच (15 जून) नानासाहेबांच्या 115 व्या जयंतीचे औचित्य साधून साधना प्रकाशनने 'नारायणीय' पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. अर्थात वीस वर्षांनंतर या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती आली आहे. हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत.  या पुस्तकातील लेख म्हणजे नानासाहेबांच्या उंचीचे मापदंड आहेत. पुस्तकाची पार्श्वभूमी मांडताना विनोद शिरसाठ यांनी म्हटले आहे की, 'राजकीय नेते अशी प्रमुख ओळख असणारे नानासाहेब किती शैलीदार व विचारप्रवण करणारे लेखन करीत होते, याचा प्रत्यय हे लेख वाचताना येतो.' त्यामुळे हे पुस्तक सजग मराठी वाचकांनी नक्की वाचले पाहिजे. या पुस्तकाच्या शेवटी कव्हर पेजवर 'तिमिरातुनी तेजाकडे' या लेखतील काही वाक्य उद्धृत केली आहेत. त्यात नानासाहेब म्हणतात की, 'आतापर्यंत मी कोणालाही गुरू केलेले नाही. गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षु असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी-मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपलेली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परिस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन, गॅलिलीच्या आसमंतातील आणि हिरा डोंगरावरील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा.' हे वाचल्यावर नानासाहेब काय उंचीचा तार्किक विचार मांडत असतील याचा अंदाज येतो. याच लेखातील काही वाक्य पुस्तकात सुरवातीला छापली आहेत. त्यात नानासाहेब म्हणतात की, 'माझ्या जीवनात मी भावनेपेक्षा विचारांना आणि विचारांहुन कृतीला अधिक महत्व देत आलो आहे. म्हणूनच रामदासाहून शिवाजी थोर, रानडयांपेक्षा फुले थोर, बर्ट्रांड रसेलपेक्षा श्वाईटझर थोर, जे. कृष्णमूर्तींपेक्षा मदर तेरेसा थोर आणि अस्पृश्यतानिवारणासाठी स्पृश्यांची मने वळवू पाहणाऱ्या गांधीजींपेक्षा अस्पृश्यांनाच बंडासाठी उभे करणारे आंबेडकर मला थोर वाटतात.' नानासाहेबांची ही वाक्य वाचकांना कृतीप्रवन करण्यासाठी पुरेशी आहेत.
◆ नारायणीय : निवडक ना.ग.गोरे
    संपादक : वसंत बापट / ग. प्र. प्रधान
    प्रकाशक : साधना प्रकाशन 020 24459635
    किंमत : 300 रुपये /सवलतीत 200 रुपये

© विशाल विमल

Wednesday, 20 January 2021

मतदारांचे मेंदू जागृत करण्याचे अभियान राबवूया

◆ परिवर्तनवादी माणसे, संस्था, संघटनांना आवाहन
आजही ग्रामपंचायत निवडणुका या पद, प्रतिष्ठा, खुन्नस, घराणेशाही, जात, पैसे आणि पक्ष याचसाठी लढविल्या जातात आणि होतात, हे स्पष्ट दिसते. गावच्या सुधारणा करण्यासाठी क्वचित एखादा उमेदवार उभा रहातो. पण त्याने जर दारू, जेवण, पैसे दिले नाहीत तर त्याचा पराभव हा बहुमताने ठरलेला आहे. अनेक ठिकाणी तरुण निवडून आले, पण त्यांनी घाणेरड्या प्रस्थापित राजकारणाचा आधार घेतला आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन तरुण निवडून आले आहेत, मात्र त्यांनीही निवडणुकीत प्रस्थापितांप्रमाणे दारू, मटण, पैसे वाटले आहेत. क्वचित काही ठिकाणी जुने अंगठेबहाद्दर पुढाऱ्यांऐवजी तरुणाईला मतदारांनी कौल दिला आहे.

एका गावातील एका वार्डातील विजयी आणि पराभूत अशा दोन उमेदवारांचे खर्चाचे आकडे मी ऐकले. त्यातील पराभूत उमेदवाराने दीड लाख रुपये आणि विजयी उमेदवाराने निवडणुकीला साडेचार लाख रुपये खर्च केले आहेत. इतका खर्च करून विजयी उमेदवाराला 520 मते आणि पराभूत उमेदवाराला 460 मते मिळाली आहेत. त्या प्रभागात 218 कुटुंब आहेत, त्यातील किती कुटुंबात पैसे, मटणाचे जेवण आणि दारू दिली ? तर मला समजले की, पराभूत उमेदवाराने 70 ते 80 घरात दिले, तर विजयी उमेदवाराने 170 ते 180 घरात  दिले. याचा अर्थ मतदार किती लाचार आहेत हे लक्षात येते. त्यामुळे लाचार मतदार किती लायकीचे उमेदवार निवडून देत असतील हेही लक्षात येते. असे मतदार, असे उमेदवार असतील तर मग पुढील पाच वर्षात कोणता मतदार निवडून आलेल्या उमेदवाराला विकासकामे करा, असे वर मान करून सांगू शकतो ? आणि विकासाला बाजूला सारून निवडणुकीत लाखो रुपये खर्च झालेला पैसा भ्रष्टाचारातून मिळवायचे कोणता उमेदवार सोडू शकतो ?
एक उमेदवार पराभूत झाला, सांगत होता की लोकशाही विकली गेली. मी त्याला विचारले की निवडणुकीत खर्च किती झाला, तर म्हणाला की, माझा अडीच लाख आणि निवडून आला, त्याचा तीन सव्वातीन लाख रुपये झाला असेल. मग मला प्रश्न पडला लोकशाही विकायला तर हाही उभा होता आणि मग असे असेल तर, याला लोकशाही विकली असे म्हणण्याचा अधिकार आहे का ? खरे तर हाही अजून एक लाख रुपये अधिक खर्च करून निवडून आला असता तर याला लोकशाही आठवली नसती. एकंदरीत हा प्रकार सर्वठिकानी पहायला मिळतो, ठरवून दिलेल्या निवडणूक खर्चापेक्षा एक पैसाही अधिक खर्च न केलेला विजयी अथवा दुसऱ्या क्रमांकाचा पराभूत उमेदवार सापडणे अवघड आहे. हातावर मोजण्याइक्याच विजयी उमेदवारांनी असे अपप्रकार केले नाहीत, असे जर असेल तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात.

महत्वाचे हे आहे की प्रस्थापित राजकाऱ्यांच्या विरोधात जाऊन मटण, दारू, पैशाचा वापर न करता निवडून येणे. पण असे चित्र दुर्मिळ आहे. जोवर असे चित्र सर्वत्र दिसत नाही तोवर लोकशाहीच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह आहे. मात्र तोवर माणसामाणसांची खूप मोठी हानी झालेली असेल. ती हानी भरून न येणारी असेलच, पण ती हानी वाढत जाणारी असेल !!

पर्याय एकच रहातो की जात, धर्म, घराणेशाही, पक्ष न पाहता आणि मटण, पैसे, दारू न घेता मतदान करणारे नागरिक तयार करणे. यासाठी मतदारांमध्ये खूप मोठी जागृती आणि सजगता निर्माण करावी लागणार आहे. खरे तर देशातील, राज्यातील कोणतेही सरकार मतदारांना अधिकाधिक शहाणे करण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण की लोकांना अज्ञानी, लाचार आणि बावळट ठेवून त्यांनाही मते घ्यायची असतात. ज्ञानी मतदार हे बावळट उमेदवार निवडत नाहीत आणि बावळट मतदार हे ज्ञानी उमेदवार निवडून देत नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या दृष्टीने लोक बावळट राहिलेले अधिक हिताचे आहे. अर्थात हे सर्व बदलायचे असेल तर माणसामाणसांचा विचार करणारी परिवर्तनवादी माणसे, संघटना, संस्था यांनी लोकांचे मेंदू विवेकी करण्याचे अभियान राबवायला हवे. 

- विशाल विमल
--------------------